वसंत पंचमी
विशेष लेख |
---|
हा लेख मराठी विकिपीडियावरील २[१]वा लेख आहे. |
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय.[२] वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.[३]
भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे.[४] वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. [५] हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे.[६] वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.[७] मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.[८]
कृषी संस्कृती
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो[५]. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.
देवी सरस्वती जयंती
हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. एकदा फिरत असताना सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना अवतीभवती शांतात वाटू लागली, त्यामुळे येथे काही कमतरता आहे असे वाटून त्यांच्या मुखातून वीणावादन करीत देवी सरस्वती प्रकट झाली अशी कथी प्रचलित आहे.[९]
- नैवेद्याचे पदार्थ
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो.[१०]
दिनांक
गेल्या किंवा येत्या काही वर्षांतील वसंत पंचमीच्या तारखा :
सन २०२२ - ४ फेब्रुवारी,
सन २०२१ - १६ फेब्रुवारी[११]
सन २०२० - ३० जानेवारी, ३१ जानेवारी
सन २०१९ - फेब्रुवारी १०
सन २०१८ - जानेवारी २२
पेशवेकालीन उत्सव
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांंची देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.[१२]
बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंंतिणींंचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.[१३]
कुंभमेळा
वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान होते.[१४]
सूर्य मंदिर
बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.[१५]
प्रेमाचे प्रतीक
मथुरा येथील बांके बिहारी मंदिरातील ४० दिवसीय होळी उत्सवाचा आरंभ या दिवशी केला जातो.[१६] प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात.[१७]
वसंत पूजा
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/09/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE.jpg/220px-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE.jpg)
महाराष्ट्रात वसंत ऋतूचे औचित्य साधून, वैदिक ज्ञानाची परंपरा जोपासलेल्या ब्रह्मवृंद समुदायाचे पूजन केले जाते. याचवेळी कैरीची डाळ आणि पन्हे यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो आणि सर्वाँना प्रसाद वाटप केले जाते.[१८]
भारताच्या विविध प्रांतांत
मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.[१९][२०]
पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.[२१]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/A_girl_in_yellow_religious_dress_for_Vasant_Panchami_Festival_in_Kolkata.jpg/220px-A_girl_in_yellow_religious_dress_for_Vasant_Panchami_Festival_in_Kolkata.jpg)
सुफी संप्रदायात
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.[२४]
शीख संप्रदायात
वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.[२५] अब हमारे घर बसंत असा उल्लेख गुरुग्रंथसाहिब मध्ये आहे. याचा अर्थ आमच्यावर आज ईश्वरी कृपा आहे असा होतो.पतियाळा येथील गुरुद्वारात या विशेष दिवसाचे आयोजन केले जाते.[२६]
भारताबाहेर
भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.[२७][२८]
बालीमध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.[२९]
चित्रदालन
- मदन आणि रती
- मोहरीची फुले
- सरस्वती पूजा
- वसंत ऋतूत बहरलेली सांवरीची फुले
- पळसाचे फूल