भारतीय संघाने आजवर खेळलेल्या ५७९ कसोटी सामन्यांपैकी १७८ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून तितकेच सामने गमावले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी २२२ अनिर्णित राहिले तर १ बरोबरीत सुटला आहे. जून २०२४ पर्यंत, भारत १२० रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये (२०२१, २०२३) आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.
संघाने १,०५५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामधील ५५९ सामन्यांमध्ये विजय, ४४३ सामन्यांमध्ये पराभव, ९ सामन्यांमध्ये बरोबरी उर्वरित ४४ सामने अनिर्णित राहिले आहेत. जून २०२४पर्यंत, भारत १२२ रेटिंग गुणांसह आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संघाने १९८३, २००३, २०११, २०२३मध्ये चार वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि त्यापैकी १९८३ आणि २०११ अशा दोनदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यात संघाला यश आले. विश्वचषक जिंकणारा हा दुसरा संघ होता (वेस्ट इंडीज नंतर) आणि २०११ मध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पहिलाच होता. भारताने २००२ आणि २०१३ मध्ये दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१८ आणि २०२३ अशा ७ वेळा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे.
२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियनशिप जिंकणारा भारत सध्याचा टी२० विश्वचषक चॅम्पियन आहे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, बीसीसीआयने संपूर्ण ४२ सदस्यीय तुकडीसाठी एकूण १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली.[१०]
इतिहास
सुरुवातीचा इतिहास (१७००-१९१८)
ब्रिटिशांनी इ. स. १७०० च्या सुरुवातीला भारतात क्रिकेट आणले आणि १७२१ मध्ये पहिला क्रिकेट सामना खेळविला गेला.[११] तो गुजरातच्या कोळ्यांनी खेळला. त्यावेळी गुजरातचेकोळीसमुद्री चाचे होते आणि ते ब्रिटीश जहाजे नेहमी लुटत असत म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने कोळींना क्रिकेट खेळून वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.[१२][१३][१४] १८४८ मध्ये, मुंबईतील पारशी समुदायाने ओरिएंटल क्रिकेट क्लबची स्थापना केली, जो भारतीयांनी स्थापन केलेला पहिला क्रिकेट क्लब आहे. संथ सुरुवातीनंतर, युरोपियन लोकांनी अखेरीस १८७७ मध्ये पारशींना सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले.[१५] १९१२ पर्यंत, मुंबईतील पारशी, हिंदू, शीख आणि मुस्लिम दरवर्षी युरोपियन लोकांसोबत चतुरंगी स्पर्धा खेळत असत. १९०० च्या दशकाच्या सुरुवातीस, काही भारतीय इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळायला गेले. यापैकी काहींचे ब्रिटीशांनी खूप कौतुक केले, ज्यामध्ये की रणजितसिंहजी आणि दुलीपसिंहजी यांचा समावेश होता आणि त्यांची नावे नंतर रणजी करंडक आणि दुलीप करंडक ह्या भारतातील दोन प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धांसाठी वापरली गेली. १९११ मध्ये, पतियाळाचे भूपिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघ ब्रिटिश बेटांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर गेला होता, परंतु केवळ हा संघ इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी नाही तर केवळ इंग्लिश काऊंटी संघांविरुद्ध खेळला होता[१६][१७]
भारताला १९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले आणि १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने त्यावेळचे सर्वोत्तम मानले जाणारे भारतीय फलंदाज सी.के. नायडू, यांच्या नेतृत्वाखाली कसोटी खेळणारे राष्ट्र म्हणून पदार्पण केले.[१९]लंडनमधील लॉर्ड्स येथे दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना खेळला गेला. यावेळी भारतीय संघाची फलंदाजीत तितकीशी मजबूत नव्हती[२०] आणि संघ १५८ धावांनी पराभूत झाला.[२१] भारताने १९३३ मध्ये पुरुषांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते. इंग्लंड हा पाहुणा संघ होता ज्याने बॉम्बे (आता मुंबई) आणि कलकत्ता (आता कोलकाता) येथे दोन कसोटी सामने खेळले. पाहुण्यांनी मालिका २-० ने जिंकली. १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय संघाने आपल्या कामगिरीमध्ये सतत सुधारणा केली परंतु या काळात संघाला आंतरराष्ट्रीय विजय मिळवता आला नाही. १९४० च्या सुरुवातीच्या काळात, दुसऱ्या महायुद्धामुळे भारतीय संघ कोणतेही कसोटी क्रिकेट सामने खेळू शकला नाही. स्वतंत्र देश म्हणून संघाची पहिली मालिका डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध (त्यावेळच्या ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाला दिलेले नाव) १९४७-४८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. भारताने खेळलेली ही पहिली कसोटी मालिका होती जी इंग्लंडविरुद्ध खेळली गेली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने पाच सामन्यांची मालिका ४-० ने जिंकली, ब्रॅडमनने त्याच्या शेवटच्या ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात भारतीय गोलंदाजीला त्रास दिला.[२२] त्यानंतर भारताने मायदेशात पहिली कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध नाही तर १९४८ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली. वेस्ट इंडीजने पाच सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली.[२३] भारताने १९५२ मध्ये मद्रास येथे त्यांच्या २४व्या सामन्यात पहिला कसोटी विजय इंग्लंडविरुद्ध नोंदविला.[२४] नंतर त्याच वर्षी, त्यांनी पहिली कसोटी मालिका जिंकली, जी पाकिस्तानविरुद्ध होती.[२५] भारतीय संघाने १९५० च्या सुरुवातीच्या काळात खेळामधील सुधारणा सुरू ठेवली आणि १९५६ मध्ये न्यू झीलंड विरुद्धच्या मालिकेमध्ये विजय मिळवला. तथापि, दशकाच्या उर्वरित काळात ते पुन्हा जिंकू शकले नाहीत आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश संघांकडून त्यांना वाईटरित्या पराभव पत्करावा लागला. २४ ऑगस्ट १९५९ रोजी, संघ कसोटीत एका डावाने पराभूत झाला आणि हा इंग्लंडकडून भारताचा आतापर्यंतचा पहिलाच ५-० असा पूर्ण पराभव होता.[२६] त्यापुढच्या दशकात घरच्या मैदानावर मजबूत रेकॉर्ड असलेला संघ म्हणून भारताची प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी १९६१-६२ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली आणि त्यानंतर न्यू झीलंडविरुद्धची मालिकाही जिंकली. त्याशिवाय पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिका आणि इंग्लंडविरुद्धची दुसरी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळविले. याच कालावधीत भारताने उपखंडाबाहेर १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध पहिली मालिका जिंकली.[२७]
एकदिवसीय क्रिकेट आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक यश (१९७०-१९८५)
१९७१ मध्ये पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या आगमनाने क्रिकेट विश्वात एक नवीन आयाम निर्माण केला. तथापि, या टप्प्यावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला मजबूत मानले जात नव्हते आणि कर्णधार गावस्करसारखे फलंदाज त्यांच्या फलंदाजीच्या बचावात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते. भारताची सुरुवात एकदिवसीय सामन्यांमध्ये एक कमकुवत संघ म्हणून झाली आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पोहोचू शकला नाही.[३३]१९७५ मध्ये पहिल्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध गावस्करच्या कुप्रसिद्ध १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांच्या संथ खेळीमुळे भारत फक्त ३ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि संघाला २०२ धावांनी पराभव पत्करावा लागला.[३४]
याउलट, भारताने कसोटी सामन्यांमध्ये एक मजबूत संघ उतरवला आणि घरच्या मैदानावर ते विशेषतः मजबूत होते, जिथे त्यांचे स्टायलिश फलंदाज आणि मोहक फिरकीपटू यांचे संयोजन सर्वोत्तम होते. भारताने १९७६ मध्ये पोर्ट-ऑफ-स्पेन येथे वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तत्कालीन कसोटी विक्रम प्रस्थापित केला, जेव्हा त्यांनी विजयासाठी मिळालेले ४०३ धावांचे आव्हान विश्वनाथच्या ११२ धावांमुळे पार केले.[३५]नोव्हेंबर १९७६ मध्ये संघाने कानपूर येथे आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघाने न्यू झीलंड विरुद्ध ९ बाद ५२४ धावांवर डाव घोषित केला. ह्या डावामध्ये कोणत्याही फलंदाजाने वैयक्तिक शतक केले नव्हते.[३६] सहा फलंदाजांनी अर्धशतके केली होती, आणि मोहिंदर अमरनाथच्या सर्वाधिक ७० धावा होत्या.[३७] ही खेळी कसोटी क्रिकेटमधील केवळ आठवी घटना होती जिथे सर्व अकरा फलंदाजांनी वैयक्तिक दुहेरी धावसंख्या गाठली.[३८]
१९३२ ते मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व कसोटी संघांविरुद्ध भारताच्या कसोटी सामन्यांचे निकाल दर्शविणारा आलेख
१९८० च्या दशकात, भारताने आक्रमक शैलीचे फलंदाज तयार केले. ज्यामध्ये मनगटी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मोहम्मद अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर आणि अष्टपैलू कपिल देव आणि रवी शास्त्री असे तडाखेबाज फलंदाज होते. भारताने १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा त्यांनी अंतिम सामन्यात फेव्हरिट आणि दोन वेळचे गतविजेते वेस्ट इंडीजचा लॉर्ड्स येथे पराभव केला. असे असतानाही, संघाने कसोटी सामन्यांमध्ये मात्र खराब कामगिरी केली. सलग २८ कसोटी सामन्यांमध्ये संघ विजय मिळवू शकला नाही. १९८४ मध्ये भारताने आशिया चषक जिंकला आणि १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे विश्व अजिंक्यपद जिंकले. मात्र याशिवाय भारतीय उपखंडाबाहेर भारत हा एक कमकुवत संघच राहिला. भारताचा १९८६ मधील इंग्लंड विरुद्धचा कसोटी मालिका विजय हा पुढील १९ वर्षांसाठी उपखंडाबाहेर भारताचा शेवटचा कसोटी मालिका विजय राहिला. १९८० च्या दशकात गावस्कर आणि कपिल देव (आजपर्यंतचे भारताचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू) त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. गावस्कर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये विक्रमी ३४ शतके केली आणि १०,००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला. नंतर कपिल देव ४३४ बळी घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज बनले.[३९] गावसकर आणि कपिल यांच्यादरम्यान अनेकद कर्णधारपदाची देवाणघेवाण केल्यामुळे हा काळ अस्थिर नेतृत्वासाठी सुद्धा प्रसिद्ध होता.[४०][४१]
२० व्या शतकाचा उत्तरार्ध (१९८५-२०००)
१९८९ आणि १९९० मध्ये सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांना राष्ट्रीय संघात समाविष्ट केल्याने संघात आणखी सुधारणा झाली. पुढील वर्षी, अमरसिंगनंतरचा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. असे असूनही, १९९० च्या दशकात, भारताने उपखंडाबाहेर ३३ पैकी एकही कसोटी जिंकली नाही तर मायदेशात ३० पैकी १७ कसोटी जिंकल्या. मायदेशात खेळवल्या गेलेल्या १९९६ क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत शेजारी श्रीलंकेने बाद केल्यानंतर, वर्षभरात संघ बदलांना समोर गेला. लॉर्ड्स वरील एकाच कसोटीत सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी पदार्पण केले आणि कालांतराने ते संघाचे कर्णधार बनले. तेंडुलकरची १९९६ च्या उत्तरार्धात अझरुद्दीनच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली, परंतु वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीमध्ये घसरणीनंतर तेंडुलकरने कर्णधारपद सोडले आणि १९९८ च्या सुरुवातीला अझरुद्दीनला पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[४२]
६१९ बळींसह, अनिल कुंबळे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा जगातील चौथा आणि भारताचा सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय विकेट घेणारा गोलंदाज आहे.[४३]
१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर, तेंडुलकरला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले आणि संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ३-० आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा पराभव पत्करावा लागला. तेंडुलकरने पुन्हा कधीही संघाचे कर्णधारपद न स्वीकारण्याची शपथ घेऊन राजीनामा दिला.[४४]
इ.स. २००० मध्ये संघाचे आणखी नुकसान झाले जेव्हा माजी कर्णधार अझरुद्दीन आणि सहकारी फलंदाज अजय जडेजा यांना मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकवण्यात आले आणि त्यांना अनुक्रमे आजीवन आणि पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.[४५][४६] या कालावधीचे वर्णन बीबीसीने "भारतीय क्रिकेटची सर्वात वाईट वेळ" असे केले आहे.[४७] तथापि, नवीन मुख्य - तेंडुलकर, द्रविड, कुंबळे आणि गांगुली - त्यांच्यासोबत असे पुन्हा घडू न देण्याची शपथ घेतली आणि भारतीय क्रिकेटला काळोखाच्या गर्तेतून बाहेर काढले. पहिल्या तिघांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवल्या ज्यामुळे गांगुली त्यांना एका नव्या युगात घेऊन जाऊ शकेल.[४८]
गांगुलीच्या नेतृत्वाखाली आणि भारताचे पहिले परदेशी प्रशिक्षक जॉन राईट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठ्या सुधारणा केल्या.[४९][५०] कोलकाता कसोटी सामन्यात, फॉलोऑन केल्यानंतर कसोटी सामना जिंकणारा भारत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील फक्त तिसरा संघ ठरला. ऑस्ट्रेलियन कर्णधारस्टीव्ह वॉने भारताला "अंतिम सीमा" असे नाव दिले कारण त्याचा संघ भारतात कसोटी मालिका जिंकण्यास असमर्थ ठरला.[५१]२००२ मध्ये, भारत श्रीलंकेसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता होता आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ते अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर २००६ च्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका जिंकून भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सलग १७ एकदिवसीय विजयाचा विश्वविक्रम केला.[५२]
२०१० मध्ये न्यू झीलंडविरुद्ध गडी बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय खेळाडू
बांगलादेशमध्ये आयोजित २०१४ आयसीसी पुरुष विश्व ट्वेंटी२० मध्ये, भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासून दूर राहिला.[५८]२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत अंतिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला, जे पुढे जाऊन विजेते ठरले.[५९]
आशिया चषक २०१६ ते दुसरे टी२० विश्वविजेतेपद (२०१६ पासून पुढे)
त्यानंतर भारताने २०१६ ची सुरुवात २०१६ आशिया चषक जिंकून केली, संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. [६०] त्यानंतर घरच्या मैदानावर आयोजित केल्या गेलेल्या २०१६ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला जिंकण्यासाठी पसंती दिली जात होती, परंतु संघ उपांत्य फेरीत स्पर्धेचे विजेते वेस्ट इंडीजकडून पराभूत झाला.[६१] भारताने २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले परंतु अंतिम फेरीत त्याच प्रतिस्पर्ध्यांकडून संघाला पराभव पत्करावा लागला, २००७ नंतर प्रथमच ते स्पर्धेच्या या टप्प्यावर भेटले होते.[६२][६३]
भारतीय संघाची पुढील प्रमुख जागतिक स्पर्धा २०१९ क्रिकेट विश्वचषक होती जिथे गट फेरीमध्ये संघ सात विजय आणि फक्त यजमान राष्ट्र इंग्लंडविरुद्धच्या एका पराभवासह गटात पहिल्या स्थानावर राहिला.[६४] त्यांनी उपांत्य फेरी गाठली परंतु उपांत्य सामन्यांत न्यू झीलंडकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला.[६५] संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ धावा केल्या. भारत २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना न्यू झीलंड विरुद्ध साउथहॅम्प्टन येथे खेळला ज्यामध्ये त्यांचा आठ गड्यांनी पराभव झाला.[६६]२०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता, परंतु त्यांचा इंग्लंडकडून दहा गाड्यांनी पराभव झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या भूमीवर २-१ ने मालिका जिंकल्यानंतर, भारत २०२३ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओव्हल येथे खेळला ज्यात त्यांचा २०९ धावांनी पराभव झाला.[६७] भारताने आर. प्रेमदासा स्टेडियमवर २०२३ आशिया चषक अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दहा गडी राखून विजय मिळवला.[६८] नऊ गडी बाद करणारा कुलदीप यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.[६९] दरम्यान, २०२२ आशियाई खेळांमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने अग्रमानांकित भारतीय पुरुष क्रिकेट संघाला सुवर्णपदक मिळाले.[७०]
२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवून सुरुवात केली होती. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी जोरदार विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर न्यू झीलंडविरुद्ध ७० धावांनी उपांत्य फेरीत विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकत विराट कोहली ५० एकदिवसीय शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनला. तसेच, मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषकामधील, भारतीयासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली (७/५७). संपूर्ण विश्वचषकादरम्यान अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला अंतिम फेरीत मात्र ऑस्ट्रेलियाकडून सहा गाडी राखून पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक ७६५ धावा करणारा खेळाडू होता, ज्या एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा होत्या.[७१]
भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून २०२४ टी२० विश्वचषक जिंकला.[७२] इंग्लंड आणि वेस्ट इंडीज नंतर दोनदा चषक जिंकणारा तो तिसरा संघ बनला आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून स्पर्धा जिंकणारा पहिला संघ बनला. अर्शदीप सिंगने सर्वाधिक १७ बळी घेतले.[७३][७४]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही भारतीय क्रिकेट संघ आणि भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. हे मंडळ १९२९ पासून कार्यरत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रातील चर्चगेट येथे 'क्रिकेट सेंटर' मध्ये आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटनांपैकी एक आहे, २००६ ते २०१० या कालावधीत भारताच्या सामन्यांचे प्रसारण हक्क $६१२,०००,००० मध्ये विकले गेले.[७५]रॉजर बिन्नी सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि जय शाह सचिव आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती भारताचे आगामी सामने भविष्यातील दौरे कार्यक्रमाद्वारे ठरवते. तथापि, बीसीसीआयने, क्रिकेट जगतातील आपल्या प्रभावशाली आर्थिक स्थिती सह, आयसीसीच्या कार्यक्रमाला अनेकदा आव्हान दिले आहे आणि बांगलादेश किंवा झिम्बाब्वे बरोबरच्या दौऱ्या पेक्षा अधिक कमाईची शक्यता असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अधिक मालिका आयोजित केल्या आहेत.[७६] भूतकाळात, प्रायोजकत्वाबाबत बीसीसीआयने आयसीसीशी संघर्षही केला आहे.[७७]
निवड समिती
भारतीय क्रिकेट संघाची निवड बीसीसीआयच्या प्रादेशिक निवड धोरणाद्वारे होते, जिथे प्रत्येक पाच प्रदेशाचे प्रतिनिधित्व एक निवडकर्ता करतो आणि बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केलेल्या सदस्यांपैकी एक असतो. यामुळे काहीवेळा हे निवडकर्ते त्यांच्या प्रदेशाबाबत पक्षपाती आहेत की नाही यावर वाद निर्माण झाला आहे.[७८]
एका खाजगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी भारतीय संघावर अनेक भडक टिप्पण्या केल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शिवसुंदर दास ह्यांची अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नेमणूक झाली.[८१]
४ जुलै २०२३रोजी, अजित आगरकर यांची नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी शर्मा यांची जागा घेतली.[८२] त्यांनी दास, बॅनर्जी, अंकोला आणि शरथ यांना निवड समितीमध्ये सामील केले.[८३]
संघाचे रंग
भारत आपले कसोटी क्रिकेट सामने नेव्ही ब्लू कॅप आणि हेल्मेट सह पारंपारिक सफेद गणवेशात खेळतो. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये परिधान केलेल्या गणवेशात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० साठी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात, काहीवेळा भारतीय ध्वजातील रंगांचा स्प्लॅश असतो.[८४]
१९९२ आणि १९९९ क्रिकेट विश्वचषकादरम्यान, भारतीय संघाची किट अनुक्रमे इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लोदिंग (ISC) आणि ASICS द्वारे प्रायोजित करण्यात आली होती,[८५][८६] परंतु त्यानंतर २००१ पर्यंत कोणतेही अधिकृत किट प्रायोजक नव्हते. भारतीय संघासाठी अधिकृत किट प्रायोजक नसताना, ओमटेक्सने संघासाठी शर्ट आणि पँट उत्पादित केले, तर काही खेळाडूंनी डिसेंबर २००५ पर्यंत आदिदास आणि रिबॉक सारख्या त्यांच्या वैयक्तिक प्रायोजकांनी त्यांना प्रदान केलेल्या पँट घालणे निवडले.
डिसेंबर २००५ मध्ये, नाइकेने आपले प्रतिस्पर्धी आदिदास आणि रिबॉकला मागे टाकले आणि जानेवारी २००६ मध्ये सुरू झालेल्या भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी पाच वर्षांसाठी करार मिळवला.[८७] नाइके टीम इंडियासाठी दीर्घकाळ किट पुरवठादार होता. त्यांना २०११[८८] आणि २०१६[८९] असा दोनवेळा करार वाढवून मिळाला होता.
नाइकेने सप्टेंबर २०२० मध्ये आपला करार संपुष्टात आणल्यानंतर,[९०]मोबाइल प्रीमियर लीग ह्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मची उपकंपनी एमपीएल स्पोर्ट्स अपेरल अँड ॲक्सेसरीजने नोव्हेंबर २०२० मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी नाइकेची किट उत्पादक म्हणून जागा घेतली. हा करार डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार होता.[९१][९२]
नोव्हेंबर २०२२ मध्ये, एमपीएल स्पोर्ट्सने त्यांचा करार संपण्यापूर्वी करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे अधिकार केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (KKCL) ला सुपूर्द केले.[९३] जानेवारी २०२३ मध्ये, एमपीएलने मे २०२३पर्यंत अंतरिम प्रायोजक म्हणून केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (KKCL) आणि किलर जीन्स (KKCL च्या मालकीचा ब्रँड) यांची नियुक्ती केली.[९४][९५]
फेब्रुवारी २०२३ मध्ये, आदिदास KKCL च्या जागी आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापूर्वी जून २०२३ मध्ये पाच वर्षांच्या प्रायोजकत्व कराराची सुरुवात करेल अशी घोषणा करण्यात आली.[९६] मे २०२३ मध्ये, बीसीसीआयने अधिकृतपणे आदिदासला मार्च २०२८ पर्यंत चालणाऱ्या पुढील पाच वर्षांसाठी त्यांचे किट प्रायोजक म्हणून घोषित केले.[९७][९८][९९]
सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.
भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.