२०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली.[१] त्या योजनेनुसार:
दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून (००.००तास) भारतातील सर्व बँकांचे एटीएम बंद राहतील. ते दि. ९ व १० नोव्हेंबरलादेखील बंद असतील.[२][३]
भारतातील सर्व बँका दि.९ नोव्हेंबर २०१६ला बंद राहतील.[२]
दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून सध्या भारताच्या चलनात असलेल्या रु. ५०० व १००० च्या सर्व नोटा व्यवहारासाठी बंद करण्यात आल्या आहेत.[२]
लवकरच रु.५०० च्या व २००० च्या नवीन नोटा भारताच्या चलनात व व्यवहारात येतील. या नोटा विशेष प्रकारच्या असतील.[२][४][५][६]
कोणीही नागरिक त्याचेजवळ असलेल्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा दि. १० नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कोणत्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकेल, व त्याऐवजी पर्यायी चलन प्राप्त करू शकेल.[२]
त्यानंतर या नोटा दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत एक प्रतिज्ञापत्र भरून रिझर्व बँकेत जमा करता येतील.[२]
सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात ११ नोव्हेंबर २०१६पर्यंत जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.[२]
नोटा बँकेत अथवा पोस्टात बदलण्यासाठी/जमा करण्यासाठी आधार कार्ड/पॅन कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे.[२]
काळ्या पैशावर, भ्रष्टाचारावर तसेच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बनावट नोटांच्या परिचलनावर याद्वारे आळा बसू शकेल. त्यासोबतच, हत्यारांच्या स्मगलिंकरिताच्या निधीवर, हेरगिरीवर आणि दहशतवादावरही नियंत्रण येईल असा भारत सरकारचा दावा आहे.[७]
यामुळे भारतातील अनेकांना आपली बेहिशेबी संपत्ती नाईलाजाने बँकेत जमा करावी लागली. त्यांची मोठीच पंचाईत झाली.