भारत
भारत किंवा भारतीय प्रजासत्ताक हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
राष्ट्रीय मानचिन्हे
राष्ट्रीय प्राणी | वाघ | |
---|---|---|
राष्ट्रीय पक्षी | मोर | |
राष्ट्रीय वृक्ष | वड | |
राष्ट्रीय फूल | कमळ | |
राष्ट्रीय प्राणी | वाघ | |
राष्ट्रीय जलचर प्राणी | गंगा डॉल्फिन | |
राष्ट्रीय सरपटणारा प्राणी | किंग कोब्रा | |
राष्ट्रीय परंपरागत प्राणी | माकड | |
राष्ट्रीय फळ | आंबा | |
राष्ट्रीय नदी | गंगा | |
राष्ट्रग्रंथ | भारताचे संविधान |
नावाची व्युत्पत्ती
'भारत नावाचा अर्थ ' भारत हे नाव कसे पडले याबद्धल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरून भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरून भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते.[२]
'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.
[ संदर्भ हवा ]
कथा
शकुंतला ही विश्वामित्र ऋषींची मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र पराक्रमी भरत होता. यावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले असा एक मतप्रवाह आहे.[ संदर्भ हवा ]
काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा जडभरत या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द आला. त्यामुळे हे स्थान हिंदुस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी दंतकथा आहे.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे 'भारत' अर्थात इंडिया (इंग्रजी: India) असे झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात भारताचे संविधान निर्माण झाले होते.
इतिहास
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारताच्या मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये. रूपांतर झाले.[३] इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सूरू झाला[४]. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.
उत्तरं यत्समुद्रस्यहिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[५] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[६]
प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,
"India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great-grandmother of tradition. Our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only".
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा-वेरूळची लेणी, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.
११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताच्या अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.[ संदर्भ हवा ] दिल्ली सल्तनत ते मोगलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघल राजवट सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली ज्याला त्यांनी स्वराज्य असे नाव दिले , ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्नस्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. इंग्लिश लोक, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली घेतले.[७] १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटिश सरकारकडे गेला.
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर महात्मा गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.[८] सरते शेवटी १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.[९] २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.[१०]
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या दहशतवादही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील एका दशकापासुन कट्टर धार्मिक समुदायांमधील जातीय तेढांमुळे धार्मिक दहशतवाद ही भारताच्या एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली.[११] १९९८ मध्ये यापाठोपाठ पाच आणखी अणुस्फोट करण्यात आले,ज्याने भारतास अणुसज्ज देशांच्या यादीत नेऊन बसविले.[११][१२] १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरून सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणिय कामगिरी केली आहे.[१३]
भूगोल
भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.[१४]
भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैऋत्य दिशेला सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व ईशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली.[१४] भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.[१५][१६] गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे.[१७] पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो.[१८] दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.[१९]
भारताला एकूण ७,५१७ kilometers (४,६७१ मैल) कि.मी. इतका समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातील ५,४२३ kilometers (३,३७० मैल) कि.मी. इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ kilometers (१,३०१ मैल) द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[२०] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.[२०]
बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात.[२१] गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडक नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मध्य भारतातून नर्मदा सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[२२][२३] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.[२४] भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरातील म्यानमार व इंडोनेशियाजवळील अंदमान व निकोबार द्वीपसमूह हे दोन द्वीपसमूह आहेत.[२५]
भारतीय हवामान हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते.[२६] हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान सुसह्य असते.[२६][२७][२८] ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आर्द्र हवामान, विषुववृत्तीय शुष्क हवामान, समविषुववृतीय आर्द्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.[२९]
चतुःसीमा
भारतीय द्वीपकल्प अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेला आहे. हिंदी महासागरात तमिळनाडूच्या जवळ श्रीलंका हा शेजारी देश आहे. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास वेढलेले आहे. पूर्वेस म्यानमार आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भीडल्या आहे. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यंच्यामधील प्रदेशात भूतान हा देश आहे. सिक्कीम व उत्तरांचल ह्या राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचल पासून पुन्हा उत्तरेकडे लद्दाख पर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीर मधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे पाकिस्तानची सीमा आहे.
राजकीय विभाग
प्रशासनाच्या सोयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश असे विभाग पाडण्यात आले आहेत.सर्व राज्ये आणि दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश | नकाशा (संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या लेखावर जाण्यासाठी नकाशावर टिचकी मारा) |
---|---|
|
मोठी शहरे
लोकजीवन व समाजव्यवस्था
भारताच्या धर्म
भारतात ६ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाजे):
१) हिंदू धर्म – ७५-७९%;
२) इस्लाम – १४%;
३) बौद्ध धर्म – ६%;
४) ख्रिश्चन धर्म – २.५%;
५) शिख – २%;
६) जैन – ०.५%.
वरील धर्मांपैकी बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि हिंदू धर्म या ४ धर्मांचा उगम भारतात झाला.
शिक्षण
भारताच्या सध्याची शिक्षणपद्धती ही बहुतांशी ब्रिटिश व पाश्चात्य पद्धतीवरून आधारित आहे. पारंपारिक गुरूकूल शिक्षणपद्धती कालौघात लुप्त पावली आहे. काही शिक्षणतज्ञ अजूनही गुरूकूल शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करतात. बहुतेक राज्यांत शालेय शिक्षण १२वी पर्यंत असते तर काही राज्यात १०वी पर्यंत असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी शास्त्र, वाणिज्य अथवा कला यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊ शकतात अथवा पदविका शिक्षण घेऊ शकतात. पदवीसाठी विद्यापीठाशी संलग्न शिक्षणसंस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये घेणे गरजेचे असते. पदवी शिक्षण अभ्यासक्रमानुसार ३ ते ५ वर्षाचे असते.
दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमध्ये शैक्षणिक सोयी उत्तरेकडील राज्यांपेक्षा जास्त आहेत. काही ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागा जास्त असतात. भारत सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश म्हणून आज ओळखला जातो. भारतात पदवी शिक्षणाच्या सोयींवर बऱ्यापैकी सोयी व उपलब्धता यांचे प्रमाण जमलेले आहे. परंतु शालेय शिक्षणावर स्तरावर अजूनही सरकार झगडत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची होणारी गळती हा ग्रामीण तसेच शहरी भागातील एक मोठा प्रश्न आहे. तसेच पदवी शिक्षणात विविध जाती जमातींबद्दलच्या आरक्षणाच्या प्रमाणाबद्दलही अनेक प्रश्न आहेत. सततच्या वाढत्या आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संधी कमी होउन अन्याय होत असल्याची भावनाही प्रबळ आहे, त्यामुळे या संदर्भात गेल्या काही वर्षात अनेक वेळा सरकार व विद्यार्थी यांच्यात हिंसाचार घडला आहे. परंतु आरक्षणामुळेच भारताच्या शैक्षणिक क्रांती घडल्याचे अनेकांचे मत आहे.
विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणही मिळू शकते त्यासाठी संलग्न क्षेत्रामध्ये पदवी असणे गरजेचे आहे. परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाबद्दल आकर्षण व सोयी गेल्या काही वर्षात वाढल्याने भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यात कल वाढला आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यास भारतीय विद्यार्थ्यांची पसंती असते. काही भारतीय विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेत. आफ्रिका व आशियातील अनेक देशातील विद्यार्थी स्वस्त व दर्जेदार शिक्षणाच्या शोधात भारतात येतात.
संस्कृती
भारतीय संस्कृती ही हडप्पा संस्कृती, नागर संस्कृती, सिंधू संस्कृती आहे.
भारतीय स्थापत्य
भारतीय स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. मोहेंजोदारोचे शहरी स्थापत्य हे प्राचीनकाळातील नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी, प्राचीन लेण्यांमधील कोरीव काम तत्कालीन स्थापत्यामधील बारकावे दर्शवतात. अजिंठा येथील बौद्ध लेणी आणि हिंदु लेणी, वेरूळ येथील हिंदू, बौद्ध व जैन लेणी तत्कालीन सर्वधर्मसमभावाचे उदाहरण आहे. खजुराहो येथील मंदिरांवरील प्रणयक्रीडारत मूर्ती तत्कालीन कलेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक उदाहरण आहे. दक्षिणेमधील अजस्त्र मंदिरे, हंपी बदामी येथील ओसाड शहरे, हळेबीड व वेलूर येथील मंदिरे दक्षिण भारतीय स्थापत्यांची उदाहरणे आहेत.
इस्लामी आक्रमणाबरोबर इस्लामी राज्यकर्त्यांनी मध्य अशियाई, पर्शियन शैली देखील भारतात आणली व काळाच्या ओघात येथील जुन्या शैलीबरोबर सरमिसळून गेली. ताजमहाल व इतर मुघल स्थापत्ये आज भारताची ओळख बनली आहेत. ताजमहाल आज नव्या युगातील ७ आश्चर्यांमध्ये गणला जातो.
आधुनिक काळात स्थापत्यशास्त्रातील प्रगतीनुसार भारतीयांनी अनेक ठिकाणी स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने सादर केले आहेत, अक्षरधामची मंदिरे हे आधुनिक व पौराणिक स्थापत्याचे उदाहरण आहे.
लाल किल्ला
लाल किल्ला (इंग्रजी: The Red Fort हिंदी – लाल क़िला ) दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा सुद्धा भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्ल्याचे खुपच संबध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजहान यांनी केली. मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला.
राष्ट्रपती भवन
राष्ट्रपती भवन हे भारत देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. ३४० खोल्या असलेली ही इमारत १९२९ साली बांधली गेली.ही एक ब्रिटिशकालीन इमारत आहे.[३०]
सचिवालय इमारत, दिल्ली
सचिवालय इमारत रायसीना टेकडी , नवी दिल्ली , भारत.
इंडिया गेट
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना सर एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्रजी: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्रजी: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे. सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालीन पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.
गेटवे ऑफ इंडिया
गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या (आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.
संसद भवन
भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. १९१२–१३ साली ब्रिटिश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
मरीन ड्राइव्ह
मरीन ड्राइव्ह मुंबई मध्ये १९२० मध्ये बांधले गेले. त्याला क्वीन’स नेकलेस असेही म्हटले जाते.
वांद्रे – वरळी सागरीसेतू
भारतीय संगीत
भारतीय संगीत हे मुख्यत्वे दोन प्रकारात गणले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत. दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणी असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.
नृत्य
भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत. भांगडा नृत्य (पंजाब), बिहु नृत्य (आसाम), छाऊ (पश्चिम बंगाल), संबळपुरी (ओडिशा), घूमर (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. तसेच आठ नृत्यप्रकारांना नॅशनल अॅकॅडॅमी ऑफ म्युझिक, डान्स ॲण्ड ड्रामातर्फे शास्त्रिय नृत्यप्रकाराचा दर्जा दिला आहे. ते भरतनाट्यम् (तमिळनाडू), कथ्थक (उत्तर प्रदेश), कथकल्ली, मोहिनीअट्टम् (केरळ), कुचिपुडी (आंध्र प्रदेश), मणिपुरी (मणिपुर), ओडिसी (ओडिशा) व सत्रीया
(आसाम) आहेत.
रंगमंच
भारतात पर रंगमंचाची परिकल्पना अतिशय पुरातन असून संस्कृत साहित्यात त्यांची नोंद आहे. गुप्त कालीन अनेक नाटके आजही प्रसिद्ध आहेत. नृत्य, संगीत व त्यांची संवादातील लयबद्धता हे भारतीय रंगमंचाचे खास वैशिष्ट्ये आहे. प्राचीन काळातील अनेक नाटके हिंदू पुराणांवर आधारित आहेत.[३१] स्थानिक नाटके देखील लोकप्रिय आहेत. गुजराथमधील भावई, बंगालमधील जत्रा, उत्तर भारताच्या नौटंकी व रामलिला तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तमिळनाडूतील तेरुकूट्टू व कर्नाटकातील यक्षगण ही स्थानिक पारंपरिक रंगामंचाची उदाहरणे आहेत. आधुनिक काळात रंगमंचामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्रातील नाटके त्याचे सुरेख उदाहरण आहे. या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचे तसेच कलेचे, अभिनयाचे सादरीकरण विविध विषयातून सादर केले जाते.
चित्रपट
भारताच्या चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे.[३२] धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ॲक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिकांपेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत, परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. [३३][३४] बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला शोले हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये लगान या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली 'स्लमडॉग मिलयोनेर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटिश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
भारतीय साहित्य
भारतीय साहित्य हे अतिशय पुरातन आहे.[३५] प्राचीन भारतीय साहित्य हे प्रामुख्याने संस्कृत व पाली बौद्ध साहित्य आहे. वैदिक कालात वेदांची निर्मिती झाली. वेद हे जगातील सर्वांत पुरातन ग्रंथ असल्याची मान्यता आहे. प्रामुख्याने संस्कृत साहित्य हे केवळ पठण होत असत व दुसऱ्या पिढीला पठणाद्वारेच सूपूर्त होत. भूर्जपत्रांवर व इतर माध्यमांवर लिहण्याची कला विकसित झाल्यावर साहित्य लिखित स्वरूपात तयार झाले. वेदांसोबत रामायण, महाभारत हे प्राचीन भारतीय साहित्याचे परमोच्च उदाहरण आहे. इतर महत्त्वाच्या साहित्य शृखलांमध्ये पुराणे, शृती व स्मृतींचा समावेश आहे. वैदिक साहित्या सोबत, जैन धर्मीय व बौद्ध धर्मीय साहित्यही प्राचीन भारतीय साहित्यांचे नमुने आहेत. गुप्त कालीन सुवर्णयुगात विविध नाटके लिहीली गेली. १० व्या शतकानंतर विविध प्रातांमध्ये साहित्य तयार झाले. संत ज्ञानेश्वर लिखित भावार्थ दीपीका, नामदेवाच्या ओव्या, एकनाथांची भारुडे, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग गाथा आदि लिहुन सामाजिक क्रान्ति घडवली. तुकारामांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक चळवळ आणली. तमिळ भाषेचे साहित्य हे संस्कृत भाषेखालोखाल पुरातन मानले जाते. इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी भाषेतही भारतीयांनी साहित्यात आपली चूणूक दाखवली. सुरुवातीच्या लेखकांनी याचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी पुरेपूर करून घेतला. रविंद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी भारतात ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो.
आहार
भारतीय पाककला ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. भारतात प्रांतानुसार आहाराच्या सवयी बदललेल्या दिसतात. उत्तर भारतात आहारात गव्हाच्या पदार्थांचा समावेश असतो तर दक्षिण व पूर्वेकडे आहारात तांदळाच्या पदार्थांचा जास्त वापर आहे. मध्य भारतात संमिश्र प्रकारचा आहार असतो. प्रत्येक प्रांतातील हवामान पावसाचे प्रमाण बदलत असल्याने तेथे पिकणाऱ्या फळभाज्या, फळे, कडधान्ये यात फरक पडतो त्यामुळे प्रांतवार आहारात मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते.[३६] मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर भारतीय आहारातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. तिखट, मिरी, लवंग, दालचिनी व इतर अनेक पदार्थ वापरून गरम मसाला, गोडा मसाला, इ. मसाले तयार केले जातात.[३७] या विविध प्रकारच्या मसाल्यांचे मिश्रण करून अजून वेगवेगळे मसाले तयार करण्यात येतात. मसाल्यांसोबत विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग चव वृद्धींगत करण्यासाठी केला जातो. मसालेदार आहारासोबत विविध प्रकारच्या मिठाया व गोड पदार्थ आहाराला परिपूर्ण बनवतात. भारतीय जेवणात प्रामुख्याने शाकाहाराचा जास्त वापर होतो. विविध प्रकारच्या भाज्या कडधान्ये, तांदूळ व गव्हाची पोळी अथवा चपाती किंवा बाजरीची/ ज्वारीची भाकरी हे शाकाहारी जेवणात प्रामुख्याने असते. मासांहारी जेवणात कोंबडी व बोकडाचे मांस प्रामुख्याने खाल्ले जाते. किनाऱ्यालगतच्या प्रदेशात (कोकण, केरळ व पूर्व किनारपट्टी), बंगाल, आसाम या प्रांतात माशांचा जेवणात समावेश असतो. भारतीय आहार हा समतोल आहार आहे.
वेशभूषा
भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्याने सुती कपड्यांचा वापर जास्त होतो. पारंपारिक वेषभूषा प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्ये आहे. तरीपण पारंपारिक वेषभूषा पुरुषांसाठी धोतर अथवा लुंगी व स्रियांसाठी साडी हे आहे. बदलत्या काळाप्रमाणे भारतीयांनी वेषभूषेतही बदल केला आहे. ग्रामीण भागात पारंपारिक वेषभूषा अजूनही प्रचलित असली तरी शहरी भागात पुरुषांचा प्रामुख्याने पॅंट शर्ट हाच पोषाख आहे. स्रिया प्रामुख्याने साडी अथवा सलवार कमीझ पसंत करतात. गेल्या काही वर्षात शहरी भागात जीन्स व टॉप हा किशोरवयीन मुलींत पसंतीचा प्रकार आहे.
सणवार व इतर सार्वजनिक सोहळे
भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. एक भारतीय मुख्य सण म्हणजे दिवाळी होय. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत. बौद्ध धर्मीयांचे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे तीन मुख्य सण आहेत. भारताच्या बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये मकरसंक्रांत, होळी, पोंगल, गणेश चतुर्थी, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, ओणम हे मह्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण नाताळ व ईदचे सण साजरा करतात.
वरील नमूद केलेल्या धार्मिक सणांसोबतच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिवस, २६ जानेवारी गणतंत्र दिवस व गांधी जयंती तसेच शिवजयंती हे सण साजरे करतात.
राज्यतंत्र
भारतीय राज्यघटनेनुसार भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा व राज्यसभेतील सभासदांना खासदार असे म्हणतात. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण ५४५ खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. हे सहसा विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अश्या ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते. राष्ट्रपती घटनात्मक दृष्ट्या भारतीय शासनातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही लोकसभा, राज्यसभा व विविध राज्यातील आमदारांच्या मतदानाप्रमाणे होते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वाधिक खासदार असणाऱ्या पक्षास राष्ट्रपती सरकार स्थापण्यास निमंत्रण देतात. या पक्षास संसदेत आपले बहुमत सिद्ध करावे लागते. बहुमतासाठी ५० टक्यापेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने वर्चस्व राखले असून सर्वाधिक वेळा सरकार स्थापन केले आहे. १९८४ च्या निवडणूकीनंतर कोणत्याही पक्षास ५० टक्क्यांचा आकडा पार करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विविध पक्षांशी युती करून सरकार स्थापनेचा पायंडा पडला आहे. सरकार स्थापन केलेला पक्ष पंतप्रधान निवडतात व पंतप्रधान मंत्रीमंडळ निवडतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी सध्याचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असले तरी घटनेत पंतप्रधान हे सर्वाधिक जवाबदारीचे पद आहे. मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री अशी विभागणी असते. विविध खात्यांचे मंत्री आपपल्या खात्याचा कारभार बघतात. सर्व मंत्री पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतात. गृह, संरक्षण, रेल्वे, अर्थ, कृषी अशी काही विविध मंत्रालये आहेत. नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून संसदही तेथेच आहे.
भारताच्या राज्यांची रचना भाषावार झालेली आहे. प्रत्येक राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे. विधानसभेच्या सभासदांना आमदार असे म्हणतात. प्रत्येक राज्यातील आमदारांची संख्या त्या राज्याच्या आकारमान व लोकसंख्येवर अवलंबून असते. महाराष्ट्र, तमिळनाडू या सारख्या मोठ्या राज्यांत विधान परिषद ही असते. राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च नागरिक तर मुख्यमंत्री हे अधिकारीक दृष्ट्या प्रमुख असतात. प्रत्येक राज्याला काही प्रमाणात स्वायत्त अधिकार आहेत उदा: करप्रणाली, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरण इत्यादी.
जैववैविध्य
भारत हा जगातील सर्वाधिक जैववैविध्यपूर्ण देशात मोडतो. भारतात प्राणी पक्षी व वनस्पतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. भारतात जगात आढळणारे सस्तन प्राणी पैकी ७.६ टक्के, पक्ष्यापैकी १२.६ टक्के, सरपटणारे प्राण्यांपैकी ६.२ टक्के, भू-जलचर प्रजाती ४.४ टक्के, ११.७ टक्के माश्यांच्या प्रजाती व ६ टक्के वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.[३८] भारताच्या अनेक प्रदेशात जैववैविध्यात स्थानिक प्रजातींची संख्या लाक्षणिक आहे. भारतीय वनस्पतींतील एकूण ३३ टक्के प्रजाती स्थानिक आहेत.[३९][४०] पर्जन्याच्या प्रमाणात असलेली मोठ्या प्रमाणातील विषमतेमुळे भारतात विविध प्रकारची वने आहेत. अंदमान निकोबार, सह्याद्रीतील तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये आद्र विषववृतीय वने आहेत तसेच हिमालयात सूचीपर्णी वृक्षांचे देखील जंगल आहे. या दोन टोकांमध्ये मध्य भारतात साल वृक्षाची आद्र पानगळी प्रकारची जंगले आहेत तसेच बहुसंख्य साग वृक्ष असलेले शुष्क पानगळी जंगले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक व राजस्थान मधील अतिशुष्क प्रदेशात बाभूळ सारख्या काटेरी वनस्पतींची जंगले आहेत.[४१]
भारतात आढरणाऱ्य अनेक प्रजाती स्थानिक असून पूर्वीच्या गोंडवन या महाखंडातून आलेल्या आहेत. भारतीय पृष्ठाचे युरेशिय पृष्ठाशी टक्कर झाल्यानंतर भारतात इतर प्रजातींचा शिरकाव झाला. दख्खनच्या पठारावरील प्रंचड ज्वालामुखीच्या हालचाली तसेच २ कोटी वर्षांपूर्वीचे हवामानातील बदल यामुळे मूळच्या बहुतांशी प्रजाती नामशेष पावल्या.[४२] भारतात आलेल्या सस्तन प्राण्यांच्या जाती ह्या बहुतांशी हिमालयाच्या पूर्व व पश्चिम कोपऱ्यातून आल्या. उदा वाघ हा भारतात म्यानमार कडून आला असे मानण्यात येते तर सिंह हा इराणच्या मार्गाने आला.[४१] म्हणूनच भारताच्या सस्तन प्राण्यात केवळ १२.६ टक्के तर पक्ष्यांमध्ये केवळ ४.५ टक्के प्रजाती स्थानिक आहेत व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ४५.८ टक्के तर उभयचर प्राण्यांमध्ये ५५.८ टक्के स्थानिक् आहेत.[३८] निलगीरी वानर हे भारताच्या स्थानिक् प्रजातीचे खास उदाहरण आहे. भारतात एकूण पक्ष्यांच्या १२०८ प्रजाती तर सस्तन प्राण्यांच्या ४५० प्रजाती आढळतात.[४३] भारतात अनेक IUCN ने निर्देशित केलेल्या अनेक प्रजाती आहेत.[४४] यात वाघ, अशियाई सिंह, पांढऱ्या पाठीचे गिधाड यांचा समावेश होतो. पांढऱ्या पाठीच्या गिधाड ज्यांची १०–१५ वर्षांपुर्वी संख्या चांगली होती ते आज जनावरांना देण्यात येणारे जे डिफ्लोमेनियॅक या औषधामुळे जवळपास नामशेष होत आले आहेत.
भारतात सस्तन प्राण्यांम्ध्येही कमालीची वैविध्यता आहे. मार्जार कुळातील सर्वाधिक प्रजाती भारतात आढळतात. भारत हा एकच देश आहे ज्यात वाघ व सिंह व बिबट्या सारख्या मोठ्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तसेच केवळ भारतातच हरिणांच्या सारंग व कुरंग प्रजाती पहावयास मिळतात.[४५] गेल्या काही वर्षात मानवी अतिक्रमणामुळे भारतीय वन्यसंपदा धोक्यात आली आहे, बहुमुल्य वन्यसंपदेचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. बेसुमार शिकारींनी १९७० पर्यंत वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. १९७२ मध्ये वन्यजीव कायदा मंजूर करण्यात आला व वाघांसह अनेक जीवांना कायद्याने संरक्षण मिळाले. बहुतांशी वन्यजीवांच्या शिकारींवर प्रतिबंध आणले. तसेच अनेक व्याघ्रप्रकल्पांची घोषणा करण्यात आली.[४६][४७]अलांछित (untouched ecosystems) नैसर्गिक ठिकाणे अजूनही भारतात अस्तित्वात आहेत. अशी ठिकाणी जशीच्या तशी रहावीत यासाठी यांना बायोस्फेअर रिझर्व म्हणून घोषित केले आहेत्. भारतात सध्या १८[४८] बायोस्फेअर रिझर्व घोषित आहेत.
अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था जगातील १२व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु अलिकडच्या काळात भारताने औद्योगिक क्षेत्रातही बरीच आघाडी मारलेली आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये सध्या १७ % वाटा शेतीचा आहे, २८ % वाटा उद्योगांचा आहे, तर ५५ % वाटा सेवांचा आहे.[१०]
सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातिल तिन क्रमावारीत तिसऱ्या स्थानी आहे.
पुस्तके
- भारताच्या भूगोलाचा अतुलनीय इतिहास (मूळ इंग्रजी लेखक – संजीव सान्याल; मराठी अनुवाद – सायली गोडसे).
- महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी. सवदी
हे सुद्धा पहा
- भारताचा इतिहास
- भारताच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)