आद्य शंकराचार्य किंवा आदि शंकराचार्य (मल्याळम: ആദി ശങ്കരൻ, संस्कृत: आदि शङ्करः ;) (इ.पू. ५०८ - इ.पू. ४७६) हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीयहिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्यांचा प्रधानकारणवाद आणि पूर्वमिमांसिकांचा ज्ञानकर्मसमुच्चयवाद खोडून काढत अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. इ.पू. ५०० च्या आसपास कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली.[१]
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.
या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (ब्रह्मसूत्र, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.
इतिहास
केरळ राज्यातील कलाडी या गावामध्ये शिवगुरू आणि आर्याम्बा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आद्य शंकराचार्य हे तीन वर्षांचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले. असे म्हणतात कि त्यांच्या वाणीवर साक्षात देवी सरस्वती विराजमान होती. त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे पालनपोषण केले. ते त्यावेळच्या परंपरेप्रमाणे, यज्ञोपवीत उपनयन संस्कार झाल्यावर गुरुगृही अध्ययनास गेले. वयाच्या आठव्या वर्षी संन्यास घेऊन गुरूच्या शोधार्थ निघाले. चालत-चालत ते मध्यप्रदेश येथील ओंकारेश्वर येथे पोचले. तेथील श्रीगुरू गौडपाद यांचे शिष्य श्री गोविंद भगवत्पाद भट यांना त्यांनी आपले गुरू केले. त्यानंतर त्यांनी अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी भारतात पदभ्रमण सुरू केले. या यात्रेचा समारोप त्यांनी काशी विश्वनाथ येथे केला. आदी शंकराचार्यांनी 'ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या' हे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी शैव व वैष्णव हा वाद संपवण्याचे एक मोठे काम केले.त्यांनी चार पीठ स्थापन केले. आद्यगुरु वयाच्या 32 व्या वर्षी परमातम्यात विलीन झाले.[२]
आदी शंकराचार्यांचे लिखित साहित्य
आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रांवरील भाष्ये जगप्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचर्यांनी आपल्या 'मठाम्नाय' या ग्रंथात, भारतातील दशनामी संन्यास प्रणाली, चारही मठ, दशनामी आखाडे व त्यांच्या आधाराने चालणारे कुंभपर्व या बाबतच्या नीती,रीती व नियम, विधान व सिद्धांत यांचे विवेचन केले आहे.[३]